बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक

पाच दिवसांच्या ताराराणी महोत्सवास सुरुवात
कोल्हापूर, दि. 6 : जिल्हयात महिला बचतगटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी भाग भांडवल व अर्थसहाय्य उपलब्ध करुन देऊन बचत गटातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच जिल्हयात बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च्‍ प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास माध्यमातून येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या महिला स्वयंसहय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाच्या जिल्हास्तरीय ताराराणी महोत्सवाचे  उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. समारंभास महापौर सरिता मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी  अमन मित्तल, महिला व बालविकास सभापती शुभांगी मगदूम, जिल्हा परिषेदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, हेमंत कोल्हेकर, श्रीमती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या कला गुणांना वाव दिल्यास तसेच त्यांना संधी उपलब्ध झाल्यास त्या संधीच सोनं करतात असा विश्वास व्यक्त करुन अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटन आणि महिला सबलिकरणाची महत्वपुर्ण काम होत असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा प्रयत्नशिल आहे. बचत गटातील महिलांना बाजारपेठांचा अभ्यास करुन विविध व्यवसाय निवडावेत, तसेच त्या व्यवसायाबाबत कौशल्य प्रशिक्षण घेणेही तितकेच महत्वाचे आहे. यंदाच्या ताराराणी महोत्सवात 162 स्टॉलची उभारणी केली असून बचतगटाच्या उत्पादनाना विक्रीसाठी ताराराणी महोत्सव हे महत्वपुर्ण दालन असल्याचेही त्या म्हणाल्या.
महापौर सरिता मोरे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, बचतगटांच्या मध्यमातून महिला सक्षमीकरणाच महत्वपुर्ण काम होत असून महिलांनी नोकरीच्यामागे न लागता बचतगटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय उद्योगामध्ये सक्रीय होऊन आर्थिकदृष्टया सक्षम बनावे,बचत गटातील महिलांना प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत आणि सहकार्य केले जाईल. असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविका सांगितले की , जिल्ह्यातील बचत गटांनी भरीव कामगिरी करुन कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. बचतगटाच्या उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ताराराणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध जिल्ह्यातील 162 समूहांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. कोल्हापूरवासींनी आगामी 4 दिवसात ताराराणी महोत्सवास भेट देऊन बचतगटांच्या उत्पादनांची खरेदी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ताराराणी महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसर एन. जी. देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले.
समारंभास नाबार्डचे सहाय्यक महा प्रबंधक नंदू नाईक,  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, स्टेट बॅुकेचे जिल्हा समन्वयक निलेश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. भालेराव, रविद्र आडसुळ, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन पानारी, सम्राट पोतदार, राजेंद्र जाधव यांच्यासह पंचायत समितीच्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या, अधिकारी आणि बचतगटांच्या महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन

 महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या पाचव्या वित्त आयोगाच्या जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आयोजित केलेल्या बैठकीत वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री.व्हि.गिरीराज यांचेकडे ग्रामविकासा संदर्भात व जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना मांडल्या व तसे लेखी निवेदन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक (वहिनी) यांनी दिले.यावेळी सातारा जि.प.अध्यक्ष श्री.संजुबाबा नाईक-निंबाळकर,सातारा नगराध्यक्षा सौ.माधवी कदम व मंत्रालयीन तसेच पुणे विभागातील वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढावी आणि या संस्थांचे कामकाज अधिक परिणामकारकरित्या होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सन 2018-19 च्या मंजूर वार्षिक आराखड्यामधील विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन करणेत येणार आहे. सदर प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण (1107), ग्रामपंचात महिला सदस्य (क्रांतीज्योती) प्रशिक्षण (738),  ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी प्रशिक्षण (295),  विस्तार अधिकारी प्रशिक्षण (35), जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी प्रशिक्षण प्रशिक्षण (340), राज्यांतर्गत अभ्यास दौरा (40), प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली प्रशिक्षण (156), राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) मानव संसाधन केडर मॅनेजमेंट प्रणाली प्रशिक्षण (50), थेट निवडून आलेले सरपंच प्रशिक्षण इ. प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रम पंचायतराज प्रशिक्षण केंद्र, गारगोटी ता. भुदरगड, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, गारगोटी ता. भुदरगड, यांचे मार्फत घेतले जाणार आहेत. तर उर्वरित प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था, कसबा बावडा आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत पूर्ण केले जाणार आहेत.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एप्रिल 2017 नंतर निवडून आलेले व अद्याप क्षमता बांधणी प्रशिक्षण न घेतलेले सरपंच, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत महिला सदस्य यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

(अमन मित्तल)                           (सौ. शौमिका महाडिक)

मुख्य कार्यकारी अधिकारी                     अध्यक्ष

जिल्हा परिषद कोल्हापूर             जिल्हा परिषद कोल्हापूर

 पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग झालेस व काटकसरीने वापर न केलेस दि. 01.01.2019  पासून  दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी सुरु करणेच्या कार्यवाहीबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरुन, दि. 07.12.2018 च्या मा. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील मंजुर ठराव क्र. 548 नुसार दि. 01.01.2019 पासून “पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोटया बसविलेस : प्रथम दंड रु. 5,000/- त्यानंतरही बसविलेस प्रतिदीन रु. 200/- याप्रमाणे वैयक्तिक नळ धारकांवर दंडात्मक कारवाई” प्रभावीपणे सुरु करणेची असलेबाबत सर्व 12 पंचायत समितींच्या गट विकास अधिकारी यांना तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या 9 उप अभियंता (ग्रापापु) यांना पाणी व स्वच्छता विभागाने दि 19.12.2018, 28.12.2018 व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 31.12.2018 च्या पत्रान्वये कळविलेले आहे.

सदर अंमलबजावणीचे प्रभावी सनियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावांची तपासणी करणेसाठी गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरुन प्रत्येक गावासाठी पालक अधिकारी (विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक इ.) यांची नियुक्ती करुन, सदर नियुक्ती अधिकारी यांनी तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत तसेच यासंदर्भातील दरमहा दंड वसुलीची व खर्चाची रक्कम विहीत नमुन्यात दरमहाच्या 5 तारखेस सादर करणेबाबत जिल्हा स्तरावरुन सुचना निर्गमीत करणेत आल्या आहेत.

करीता, सर्व ग्रामस्थांनी तात्काळ नळांना तोटया बसवून दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनास सहकार्य करावे पाण्याचा अपव्यय टाळण्यात योगदान दयावे असे आवाहन मा. सौ. शौमिका महाडीक, अध्यक्षा, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले आहे.

 

(प्रियदर्शिनी चंद्रकांत मोरे)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

1 जानेवारीपासून जिल्हयात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला’ सुरूवात

1 जानेवारीपासून जिल्हयात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला’ सुरूवात

(शौचालयाची सुंदर रंगरंगोटी केल्यास राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने सन्मानित)

 

कोल्हापूर : दि.31/12/2018

केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून दि.1 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेचा हेतू ग्रामीण भागतील प्रत्येक कुटुंबाने आपले शौचालय स्वच्छ, सुंदर दिसावे व शौचालय प्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात हा आहे. या उपक्रमासाठी कुटुंब प्रमुखाने स्वनिधीतून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रंगरंगोटी करावयाची आहे.

या स्पर्धेअंतर्गत सहभागी प्रत्येक कुटुंबाने त्यांचे वैयक्तिक शौचालय नव्याने रंग देवून स्थानिक कलांच्या व्दारे त्यावर स्वच्छतेच्या संदेशांची निर्मिती करावी.स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) चा लोगो सुध्दा यावर रंगवू शकतील.

स्पर्धेची औपचारिक सुरूवात ü दि. 1 जानेवारी,2019 रोजी करणेत येणार आहे. अभियान कालावधीत एकूण शौचालय संख्येच्या प्रमाणात  रंगवलेल्या संख्येच्या टक्केवारिप्रमाणे राज्यातील तीन उत्कृष्ट जिल्हे निवडले जातील. या प्रमाणे जिल्हयातील 5 ग्राम पंचायती  अशा निवडल्या जाणार आहेत ज्यांनी कल्पकतेने शौचालय रंगविलेले असेल. त्या पाच ग्राम पंचायतीमधील छायाचित्र राज्यस्तरावर पाठविले जाणार आहे.

राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या फोटो व माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरासाठी राज्यस्तरावरून नामनिर्देशन करण्यात येईल. जिल्हयाकडून रंगविलेल्या शौचालयांची गावनिहाय तालुकानिहाय छायाचित्रांसह माहिती 25 जानेवारी 2019 पर्यंतच पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेकडे पाठविली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदे मार्फत, सदर स्पर्धेत जास्तीत जास्त कुटुंबांनी व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविणेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर “स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धात” प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक उत्कृष्ट शौचालयासाठी निवडले जाणार आहेत, व शौचालय संख्येच्या प्रमाणात एक उत्कृष्ट ग्राम पंचायत निवडली जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर या स्पर्ध अंतर्गत उत्कृष्ठ शौचालयासाठी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक निवडले जाणार असुन, शौचालय संख्येच्या प्रमाणात शौचालय रंगविलेल्या पाच ग्रामपंचायती व उत्कृष्ठ तालुक्याची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उत्कृष्ठ शौचालय कुटुंबांना, ग्रामपंचायतींना व तालुक्यांना प्रमाणपत्र देवुन सन्मानित करणेत येणार आहे.  या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होणेबाबत मा.सौ. शौमिका महाडीक, अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर व मा. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर यांनी आवाहन केले आहे.

 

(प्रियदर्शिनी चं.मोरे)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पा. व स्व.)

जिल्हा परिषद, कोल्हापूर

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर

गोवर रुबेला लसीकरण मोहिम कोल्हापूर जिल्हयामध्ये 27 नोव्हेंबर 18 पासून मोठया उत्साहत सुरुवात झाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकप्रतिनिधिनी  सहभागी झाले असून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आशा विविध ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते.  या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वयोगटातील एकुण  767340  इतके लाभार्थी निश्चित झाले असून मोहिम सुरु झालेपासून केवळ 09 दिवसामध्ये  378437 इतक्या मुला-मुलीना लसीकरण करण्यात आले असून हे काम एकुण उदिदष्टाच्या 49 टक्के  झाले आहे. लस दिलेल्या  378437 लाभार्थ्या पैकी केवळ 03 मुलांना लसीकरणा नंतर किरकोळ स्वरुपाच्या गुंतागुंत आढळली आहे. गुंतागुंतीचे प्रमाण हे 0.0007 टक्के इतके अत्यल्प आहे.

गुंतागुंतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी गुंतागुंत झालेल्या लाभार्थीला तत्काळ उपचार, संदर्भ सेवा तज्ञ मार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नागरिकांनी  न घाबरता आपल्या मुला-मुलीनां  लसीकरण करुन घ्यावे व आपल्या  पाल्यांना गोवर, रुबेला सारख्या जीव घेण्या आजारापासून संरक्षीत करावे. गोवर रुबेलाची लस अत्यंत सुरक्षीत व  परिणामकारक आहे. ही लस महाराष्ट्रमध्ये  पुणे येथे उत्पादित होत असून जगभरातील 70 देश हया लसीचा वापर करीत आहेत.  राज्यात पहिल्यांदाच मोठया प्रमाणात इंनजेक्टेबल मोहिम होत आहे. लसीकरण प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळा, अंगणवाडी व आरोग्य संस्था आशा विविध ठिकाणी  8500 सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्राच्या ठिकाणी सर्व साधन सामुग्रीनी सुसज्ज, प्रशिक्षीत लसीकरण पथक, अत्यावश्यक औषधसाठासह  तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपलब्ध ठेवण्यात आला आहे. प्रत्येक बालकांच्या सुरक्षतेसाठी  नवीन सुई (auto disposable synringe) चा वापर करण्यात येत आहे. लसीकरणानंतर मुलांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येत असून कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होणार नाही यांची दक्षता घेण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे उच्चाटन होणेसाठी  सर्व पालकांनी 100 टक्के सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी व एक सशक्त भारत देश घडवण्याचे योगदान दयावे.

या मोहिमेध्ये सर्व लोकप्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय संघटना आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग , जिल्हा माहिती कार्यालय, प्रिन्ट मेडिया, इलेक्टॉनीक मेडिया  यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.   यापुढे मोहिम पूर्ण होई पर्यत असेच सहकार्य मिळावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहवान करण्यात येत आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी

 जिल्हा परिषद कोल्हापूर

दिनांक  06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन  साजरा केलेबाबत.

दिनांक  06 डिसेंबर 2018 रोजी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना जिल्हा परिषद, कोल्हापूर च्या वतीने सकाळी ठिक 11-00 वाजता  आदरांजली वाहणेत आली.  त्या प्रसंगी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व  मा. शिक्षण व अर्थ समिती सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते फोटो पूजन करणेत आले.

यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी देश,समाज, विद्यार्थी यांच्या हितासाठी आंबेडकरांचे योगदान,या विषयी माहिती दिली.  मा. उपाध्यक्ष श्री. सर्जेराव पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)  रविकांत आडसुळ, उप मुख्य  कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) राजेंद्र भालेराव,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) आशा उबाळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) किरण लोहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व प्रभारी समाज कल्याण अधिकारी डॉ संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह  सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

श्री. बी.पी.माळवे  सहाय्यक शिक्षक यांनी सुत्रसंचलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी, ही विनंती.

सही/-

(रविकांत आडसुळ)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

                                                                          जिल्हा परिषद, कोल्हापूर

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती

कोल्हापूर दि ३ – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी  जिल्हयात डीजीटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात  येणार आहे.
आज सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या परिसरात  डिजिटल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून  मा. अध्यक्ष, सौ. शौमिका महाडीक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती मा. श्री. सर्जेराव पाटील,  समाज कल्याण सभापती मा. श्री. विषांत महापुरे, जेष्ठ जि.प. सदस्य मा. श्री. अरूण इंगवले, श्री.विजय भोजे, श्री. हेंमंत कोलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व. ) प्रियदर्शिनी मोरे, सर्व विभागाचे खातेप्रमुख तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षचे तज्ञ व सल्लागार  आदींची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने ही व्हॅन कोल्हापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे.
ही व्हॅन जिल्ह्यातील १५० गावात जाणार आहे,  डिजिटल व्हॅनद्वारे ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाडी आणि महिला बचत गट यांना स्वच्छतेविषयक फिल्म दाखवण्यात येणार आहे.
राज्याच्या माहिती व जनसंपर्क  विभागाचे वतीने मुंबई येथील आर.डब्ल्यु प्रमोशन संस्थेच्यावतीने आज पासून जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायती मध्ये ही व्हँन फिरणार आहे.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने ही मोहिम आखण्यात आली आहे. शाश्वत स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मेला गाळ व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन,  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, गटार मुक्त व शौषखड्डेयुक्त गाव अभियानाची माहिती या डिजीटल व्हॅनद्वारे ग्रामस्थांना दाखवण्यात येणार आहे.